‘मना’चे श्लोक’ चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
‘मना’चे श्लोक’ चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत जबरदस्त आणि दर्जेदार चित्रपटांची चलती आहे. अशातच गणराज स्टुडिओ आणि ‘संजय दावरा’ एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका खास दरवाजाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्या दरवाज्याचे एक दार निळे तर दुसरे लाल रंगाचे असून या दृश्यातून ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट मानवी मनाच्या खोल, गुंतागुंतीच्या भावनांचा शोध घेतो, हे स्पष्ट होते. अनेकदा चित्रपटात नायिकेसोबत एक किंवा दोन नायक पाहायला मिळतात, मात्र या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह सहा नायक दिसणार आहेत का असे हा व्हिडीओ पाहून वाटतेय. राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे सहा अभिनेते या चित्रपटात झळकणार आहेत. आता हे सहाही अभिनेते मृण्मयीचे नायक आहेत का? याचा उलगडा लवकरच होणार आहे.
गणराज स्टुडिओज, संजय दावरा आणि नितीन वैद्य हे तिघेही नावाजलेले निर्माते या निमित्ताने एकत्र आले असून त्यांनी आजवर अनेक दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. फिल्म मेकिंगपासून ते फिल्म प्रदर्शनापर्यंतचा त्यांचा प्रवास लक्षवेधी आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. मृण्मयीने याआधी ही ‘मन फकीरा’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून प्रेक्षकांनी ‘मन फकीरा’ ला प्रचंड प्रेम दिले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून तीन निर्मात्यांसह मृण्मयी काहीतरी कमाल घेऊन येत आहे, असे दिसतेय. श्रेयश जाधव राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘बाबू बँड बाजा’ नंतर ‘मना’चे श्लोक’ मधून नवीन कथा घेऊन येत आहेत. ‘नाळ’ सारखा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना देणारे नितीन वैद्य या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. तसेच संजय दावरा या क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असून ते या चित्रपटातून मराठी व्यावसायिक चित्रपटात पहिल्यांदाच निर्माता म्हणून पदार्पण करत असल्याने सगळ्यांनाच या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. ही सर्व मंडळी एकत्र आल्याने प्रेक्षकांना काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळेल हे नक्की.
चित्रपटाबद्दल मृण्मयी देशपांडे म्हणते, “दिग्दर्शक, लेखिका म्हणून हा माझा दुसरा चित्रपट आहे. ही माझ्या मनातलीच गोष्ट आहे, जी मी चित्रपटाच्या माध्यमातून साकारली आहे. यात माझ्यासोबत सहा गुणी अभिनेते आहेत. ज्यांच्यामुळे एक छान टीम जुळून आली आहे. एकंदरीत सगळेच खूप छान जमून आले आहे. म्हणूनच या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे.”
निर्माते संजय दावरा म्हणाले “गणराज स्टुडिओसोबत आणि मृण्मयीसोबत माझे जुने नाते आहे. ‘मना’चे श्लोक’ ही एक अनोखी संकल्पना आहे आणि मला वाटते मराठी चित्रपटसृष्टीत अशा प्रकारचा विषय पहिल्यांदाच मांडला जात आहे. या कथेवर मी आणि मृण्मयी अनेक दिवस काम करत होतो आणि आता आम्ही प्रदर्शनासाठी सज्ज आहोत. प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच भावेल, याची मला खात्री आहे.”
निर्माते श्रेयश जाधव म्हणतात, “खूप वेळानंतर एक उत्तम आशय व कथा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. मृण्मयीचे लेखन, दिग्दर्शनाची कामगिरी याआधी ही पाहिली आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळे व रंजक पाहायला मिळेल.”
प्रस्तुतकर्ता नितीन वैद्य म्हणाले, “मृण्मयी माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती एक उत्तम अभिनेत्री आणि दिग्दर्शिका देखील आहे. एक दिग्दर्शक म्हणून तिची कामगिरी मी याआधी पाहिली आहे, त्यामुळे तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी या चित्रपटाचा भाग झालो.”
By Sunder M