Education

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ मुंबईचा चौथा दीक्षांत समारंभ आज दिमाखात पार पडला

शैक्षणिक गुणवत्ता, परिश्रम आणि यशाचा गौरव

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबईच्या (MNLU Mumbai) शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आज नोंदवला गेला. प्रभादेवी, मुंबई येथील ऐतिहासिक रवींद्र नाट्यमंदिरात विद्यापीठाचा चौथा दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या समारंभाला मान्यवर, पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधी शिक्षणातील आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा हा अत्यंत अभिमानाचा आणि संस्मरणीय क्षण ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गानाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण सभागृहात औपचारिकता, गांभीर्य, राष्ट्रभावना आणि प्रादेशिक अभिमान यांचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर MNLU मुंबईचे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिलीप उके यांनी स्वागतपर भाषणासह विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. आपल्या भाषणात त्यांनी मागील वर्षभरातील विद्यापीठाची शैक्षणिक प्रगती, संशोधन क्षेत्रातील योगदान आणि संस्थात्मक वाढ यांचा सविस्तर आढावा मांडला.

या दीक्षांत समारंभाला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा MNLU मुंबईचे कुलपती मा. श्री. न्यायमूर्ती आलोक अराधे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी दीक्षांत भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मा. सौ. न्यायमूर्ती भारती डांगरे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. श्री. न्यायमूर्ती संदीप मारणे, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता मा. डॉ. मिलिंद साठे, इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्च (IIULER), गोवा चे कुलगुरू प्रा. (डॉ.) आर. वेंकट राव, प्रा. (डॉ) प्रवीणा खोब्रागडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी विभाग, RTM नागपूर, तसेच MNLU मुंबई चे कुलसचिव मा. प्रा. (डॉ.) श्री. प्रकाश चौधरी हेही मान्यवर उपस्थित होते.

समारंभाच्या औपचारिक उद्घाटनाची घोषणा मा. श्री. न्यायमूर्ती आलोक अराधे यांनी केली. त्यानंतर दिवसातील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या क्षणाला सुरुवात झाली – पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्याच्या सोहळ्याला

२५५ विद्यार्थ्यांना पदवी; विविध अभ्यासक्रमांतील गुणवंतांचा पदकांनी गौरव

पदवी प्रदान सत्रात विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण २५५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (PhD) मधील ३ विद्यार्थी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील १३३ विद्यार्थ्यांत एल. एल. एम. एम. ए. मेडिएशन आणि एमबीए या अभ्यासक्रमांचा समावेश होता. तसेच बी. ए. एलएल.बी. (ऑनर्स) या अभ्यासक्रमातील ११९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. याशिवाय सर्व अभ्यासक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांना पदकेही प्रदान करण्यात आली.

अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, कठोर शैक्षणिक अभ्यास, मूट कोर्टमधील सहभाग आणि विधी संशोधनाच्या बळावर विद्यार्थ्यांनी हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव पुकारले जाता सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि त्या क्षणाने समारंभाला विशेष भावनिक उंची प्राप्त झाली.
विविध बॅचमधील शैक्षणिकदृष्ट्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि विद्यापीठाच्या मूल्यपरंपरेला अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशातून विधी शिक्षणातील उत्कृष्टतेला चालना देण्याच्या MNLU मुंबईच्या बांधिलकीची प्रभावी प्रचिती आली.

*दीक्षांत भाषणातून प्रेरणा, मूल्ये आणि जबाबदारीचा संदेश*

MNLU मुंबई चे कुलपती मा. श्री. न्यायमूर्ती आलोक अराधे, न्यायाधीश, भारताचे सर्वोच्च न्यायालय यांनी आपल्या दीक्षांत भाषणात न्यायव्यवस्थेतील प्रदीर्घ आणि समृद्ध अनुभवाच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्धरणाचा दाखला देऊन म्हणाले की, संविधानिक नैतिकता ही निसर्ग दत्त नसून तिचे रोपण आणि सिंचन करावे लागते. वकील म्हणून केवळ कायद्याचे ज्ञान पुरेसे नसून संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता या मूल्यांनाही तितकेच महत्त्व आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे कार्य करणे ही प्रत्येक विधिज्ञाची मूलभूत बांधिलकी असली पाहिजे, असेही ते म्हणाले, शिक्षण विद्यार्थ्यांना विचारशक्ती आणि तर्कशक्ती प्रदान करते; मात्र बाह्यजगतातील अनुभव त्यांच्या व्यावहारिक समज अधिक सक्षम आणि परिपक्च करतात, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. तसेच MNLU मुंबई चे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिलीप उके यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संस्थेची दृष्टी, मूल्याधिष्ठित शैक्षणिक दृष्टिकोन आणि पदवीधर विद्यार्थ्यांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. त्यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. MNLU मुंबईतील विविध संशोधन केंद्रांद्वारे राबविण्यात आलेल्या शैक्षणिक आणि संशोधनपर उपक्रमांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच विद्यापीठातील एकूण प्लेसमेंट्समध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (NALSA) सहकार्याने तयार करण्यात आलेल्या इंटर्नशिप अहवालाच्या प्रकाशनातून त्याचे ठोस प्रतिबिंब दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले.

समारोपाच्या सत्रात कुलपतींनी दीक्षांत समारंभ समाप्त झाल्याची औपचारिक घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रीय गानाने कार्यक्रमाची सांगता झाली. अशा रीतीने शैक्षणिक अभिमान, औपचारिकता, प्रेरणा आणि संस्मरणीय क्षणांनी नटलेला हा समारंभ उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ कोरला जाईल, अशा वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याचे व्हिडिओ चित्रण डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक पहा: https://drive.google.com/drive/folders/1AAttGeUdd3t6nKcntsQ3iNKZOMOGXyNT?usp=sharing

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *