‘मन जुळले’ ‘रुबाब’ चित्रपटातील रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ चित्रपटातील नवे रोमँटिक गाणे ‘मन जुळले’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेमाच्या हळुवार भावना मांडणारे हे गाणे रिलीज होताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या गाण्यात संभाजी ससाणे आणि शितल पाटील या जोडीच्या प्रेमप्रवासाची सुंदर झलक पाहायला मिळते. एकमेकांबद्दल उमलणाऱ्या भावना, न बोलता समजून घेणारे क्षण, नजरेतून व्यक्त होणारे प्रेम आणि मन जुळल्यानंतरची ती नाजूक भावनिक जवळीक हे सगळे ‘मन जुळले’ या गाण्यात अतिशय हळुवारपणे साकारण्यात आले आहे. त्यामुळे हे गाणे प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाचा आवाज बनते.
केतकी माटेगावकरच्या सुमधुर आणि भावस्पर्शी आवाजाने सजलेले ‘मन जुळले’ हे गाणे ऐकताच मनात अलगद घर करते. तिच्या आवाजातील कोमलता आणि प्रेमळ स्पर्श या गाण्याला एक वेगळीच उंची देतो. चिनार–महेश यांच्या मधुर संगीताने या गाण्याला हृदयाला भिडणारी लय लाभली आहे, तर समीर आशा पाटील यांच्या अर्थपूर्ण आणि भावनांनी ओथंबलेल्या शब्दांनी प्रेमाची गहिरी अनुभूती उलगडली आहे.

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “ रुबाब’ हा चित्रपट आत्मसन्मान, संघर्ष आणि ध्येयाचा प्रवास दाखवतो. परंतु प्रत्येक ताकदवान व्यक्तीमागे एक प्रेमळ हृदय असते. संभाजी आणि शितलच्या नात्यातील ते शुद्ध, नितळ प्रेम ‘मन जुळले’ या गाण्यात दिसून येते. या गाण्यात त्यांच्या भावनांची कोमलता, एकमेकांवरील विश्वास आणि मन जुळल्यानंतरची ती शांत, सुखद अनुभूती प्रेक्षकांना जाणवेल. या गाण्यातून प्रेमाची खरी भावना अनुभवता येते.”
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे व शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
By Sunder
