राहुल चौधरी दिग्दर्शित ‘इबलिस’ चित्रपट येत्या २० जूनला होणार प्रदर्शित, सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा
राहुल चौधरी दिग्दर्शित ‘इबलिस’ चित्रपट येत्या २० जूनला होणार प्रदर्शित, सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला की आता लढाई होणार…त्यानंतर ‘इबलिस’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये किल्ला, शाळेच दप्तर, दुर्बीण, दूरध्वनी आणि भगवा झेंडा विशेष लक्ष वेधून घेतं आहे. त्यामुळे चित्रपटप्रेमी प्रेक्षकांना काहीतरी हटके पाहण्याची पर्वणी लवकरचं मिळणार आहे. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन आणि सार्थी एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘इबलिस’ हा चित्रपट येत्या २० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
पालकांना आणि शिक्षकांना गोंधळात टाकून इतिहास आठवायला लावणारी काही इबलिस मुलं येत आहेत तुम्हाला भेटायला. ही इबलिस कार्टी एक मोहीम आखतात आणि ती मोहीम तडीस नेण्यासाठी आपल्या विचारांशी समरस होऊन येणाऱ्या कठीण परिस्थितीवर कशी मात देतात. त्याची अनसुनी कहाणी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बंदुक्या फेम दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी यांनी इबलिस या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेते नामदेव मुरकुटे यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन, सार्थी एंटरटेनमेंट आणि प्राजक्ता राहुल चौधरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. विजय निकम, पूनम शेंडे, अशोक केंद्रे, मंगेश सातपुते, नामदेव मुरकुटे आणि राजेश आहेर हे प्रमुख कलाकार असून यात ११ लहान मुलांनी देखील या चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे.
दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी ‘इबलिस’ चित्रपटाविषयी सांगतात, “’इबलिस’ हा उर्दू शब्द आहे. अतिबुद्धिमान आणि सगळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लहान मुलांना गावाकडे इबलिस म्हणून संबोधले जाते. या चित्रपटात अशीच ११ लहान मुल आहेत त्यामुळे या चित्रपटाचं नाव इबलिस ठेवलं आहे. २०१७ – २०१८ मध्ये माझ्या बंदुक्या या चित्रपटाला जे यश मिळाल, अनेक पुरस्कार मिळाले, भरभरून प्रेम मिळाल. त्यामुळे सामाजिक विषयांना धरून मनोरंजक चित्रपट करावा अस मी ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लहान मुलांमध्ये कसे रुजवू शकतो हा विचार मी करत होतो. मग मी ६ महिने रिसर्च करून अनेक वर्कशॉक घेवून तसेच या चित्रपटाचे लेखक नामदेव मुरकुटे यांच्याशी चर्चा करून हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. आणि हा चित्रपट येत्या २० जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासमवेत जरूर पहावा.”
By Sunder M