EntertainmentMarathi

शैलेश नरवाडे घेऊन येताहेत लोकप्रिय “जयंती” चित्रपटाचा दुसरा भाग

आजच्या या तरुण पिढीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा पडणारा प्रभाव आणि विचारांमधून समाजात होणारा सकारात्मक बदल यावर भाष्य करणारा “जयंती” हा चित्रपट २०२१ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. आता तब्बल पाच वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच “जयंती २” हा चित्रपट येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

“जयंती २” या चित्रपटाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. “जयंती” चित्रपटाचा प्रमुख चेहरा असलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे, मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे , सुहास मुंडे आणि सौरभ गुरु यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वररूप यांचे संगीत लाभले असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे.

“जयंती” चित्रपटाच्या पहिल्या भागाला त्याच्या वेगळ्या विषयामुळे रसिक प्रेक्षकांचा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मुख्यतः चित्रपटाचा विषय हा विशेषतः तरुणाईच्या मनाला भिडला होता. त्याच्या मनात असलेली भावना ही चित्रपट माध्यमातून दाखविण्यात आली होती. “जयंती २” च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली तेव्हा पासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता “जयंती २” मध्ये नक्की काय घडणार? कथानक कोणते रंजक वळण घेणार? यासाठी रसिक प्रेक्षकांना अजून थोडी वाट पहावी लागणार असून मला खात्री आहे की प्रेक्षकांना “जयंती २” नक्कीच आवडेल असे चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी सांगितले.

 

 

By Sunder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *