Entertainment

‘संत तुकाविप्र’ साहित्याचा आध्यात्मिक ठेवा सज्ज; अभंग चित्रफीत आणि माहितीपटाचे लोकार्पण

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत विविध संतांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा दिली आणि आजचा महाराष्ट्र घडवण्यात मोलाचा वाटा उचलला. संतांच्या प्रेरणेतून अनेक विधायक चळवळी उभ्या राहिल्या. भारतीय संत परंपरा ही समाजव्यवस्थेचा भक्कम कणा असून, संतांचे खरे कार्य त्यांच्या जीवनकथांपेक्षा त्यांच्या साहित्यामधून अधिक प्रभावीपणे उलगडते.

प्रत्येक संताने भक्तिमार्गातून आपले योगदान दिले असले तरी आजही अनेक संतांचे कार्य आणि विचार समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाहीत. ‘संत तुकाविप्र’महाराज हे अशाच थोर संतांपैकी एक. संत एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतील हे महान सत्पुरुष होते. त्यांच्या अभंगांमधून भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग असल्याची जाणीव होते. वारकरी संप्रदायाशी निष्ठा ठेवून त्यांनी अध्यात्म, भक्ति आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

महाराष्ट्राचे संतसाहित्य हे अमूल्य सांस्कृतिक संचित आहे. मात्र ‘संत तुकाविप्र’ महाराजांचे साहित्य आजही व्यापक स्तरावर पोहोचलेले नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून ‘संत तुकाविप्र’ साहित्य प्रचार आणि प्रसार या प्रकल्पातंर्गत त्यांच्या अभंगांची चित्रफीत आणि त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. ‘संत तुकाविप्र’ यांच्या जीवनकार्यावर आधारित मोबाईल अ‍ॅपचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या समृद्ध साहित्य संपदेचा ठेवा लवकरच पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे ‘संत तुकाविप्र’ संस्थान अंजनवती यांचे सहकार्य यासाठी लाभले आहे.

‘संत तुकाविप्र’ साहित्य प्रचार आणि प्रसार प्रकल्पाद्वारे त्यांच्या अभंगांना आधुनिक माध्यमांची जोड देत प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. चित्रफीत आणि माहितीपटाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार घडवण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

‘संत तुकाविप्र महाराजांचे अभंग मराठीतील दिग्गज गायक आनंद भाटे आणि ऋषिकेश रानडे यांच्या सुरांनी सजले असून, संगीतकार कमलेश भडकमकर यांनी त्यांना उत्कृष्ट संगीतसाज दिला आहे. या अभंगांची सादरीकरणे अत्यंत भावपूर्ण आणि प्रभावी ठरली आहेत.

या वेळी उपस्थित मान्यवरांनीही ‘संत तुकाविप्र’ महाराजांचे साहित्य समाजापर्यंत अधिक प्रमाणात पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी पुढाकार घेऊन या विचारांचा प्रसार करावा, असे मत मांडण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संत एकनाथ संस्थान, पैठण येथील ह. भ. प. विनीत महाराज गोसावी उपस्थित होते. कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन करणारे प्रकाश महाराज बोधले यांना वारकरी संप्रदायात विशेष मानाचे स्थान आहे. तसेच विनीत महाराज गोसावी हे संत एकनाथांच्या परंपरेतील चौदावे वंशज असून, ‘संत तुकाविप्र’ महाराजांच्या कार्याशी त्यांचा आध्यात्मिक संबंध अधोरेखित होतो.

एकूणच, ‘संत तुकाविप्र’ महाराजांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संत परंपरेचा विचार अधिक व्यापक करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *